पुणे: पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघ आणि मनुष्यत्व यावर महत्त्वपूर्ण विचार मांडले. 'संघ म्हणजे काय? तर संघ म्हणजे आपलेपणा. एवढं सरळ आणि साधं त्याचं स्वरूप आहे,' असं म्हणत त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीचं वर्णन केलं.
संघ काय करतो?
भागवत म्हणाले, 'संघ हिंदू समाजाचं संघटन करतो. आपल्यात आपलेपणाची भावना निर्माण करतो. माणसाला बुद्धी आहे, ती जर विचारांच्या योग्य दिशेने वापरली तर तो चांगला होऊ शकतो. पण ती बुद्धी उलट दिशेने वळली, तर वाईटाकडे जाऊ शकतो. आपलेपणाचं भान ठेवणं हे त्याला चांगलं बनवतं.'
संघाचं कार्य:
'आज समाज आपलेपण विसरत चाललाय, संघ हेच आठवण करून देतो. प्रत्येक कार्यक्रम शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांच्या विकासासाठी असतो. स्वयंसेवक आपलेपणाचं शिक्षण घेतो आणि तेच समाजात पसरवतो. सेवा हेच आमचं मुख्य कर्तव्य आहे,' असं त्यांनी स्पष्ट केलं.
महिला आणि तरुणांचा सहभाग:
'संघात अनेक कामं अशा पद्धतीने सुरू झाली की चार स्वयंसेवक विचार करतात आणि त्या विचारातून उपक्रम उभे राहतात. ही कामं बैठकीत ठरलेली नसतात. ती आत्मभानातून उभी राहतात,' असं भागवत म्हणाले.
हेही वाचा: 5 तारखेच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा
भाषा आणि संस्कार:
'आज इंग्रजी बोलणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. पण ‘ग्रीन बॅक’ म्हणजे गिव्हिंग बॅग हे शब्द आज असले तरी त्यामागे आपलेपणाची भावना असावी, हे लक्षात घेतलं पाहिजे,' असं सांगताना त्यांनी भाषेच्या वापराबाबत जागरुकता व्यक्त केली.
आयुर्वेद विद्यापीठाबाबत मागणी:
'पुण्यात आयुर्वेद विद्यापीठ सुरू व्हावं, अशी आमची इच्छा आहे. समाजाचं आरोग्य टिकवण्यासाठी अशा गोष्टींची नितांत गरज आहे,' असं भागवत यांनी आवर्जून सांगितलं.
समाजासाठी मार्गदर्शन:
'महापुरुष हेच आपल्याला योग्य दिशा दाखवतात. प्रवासात अडचणी आल्या, थकवा आला तरी सोबत मिळाली की माणूस पुढे जातो. त्याचप्रमाणे समाजासाठीही एकमेकांची साथ आवश्यक आहे,' असं सांगत त्यांनी उदाहरणाच्या रूपाने ‘सोबत’ आणि ‘समाजपरिवर्तन’ यामधील संबंध स्पष्ट केला.
भागवत यांचा संदेश स्पष्ट:
'संघाचं काम म्हणजे केवळ संघाचं नसून, ते प्रत्येक माणसाचं आहे. हे मनुष्यत्वाचं काम आहे. समाजाने एकत्र येऊन, आपलेपणाने हे कार्य केलं पाहिजे,' असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला.