मुंबई: गुढीपाडवा निमित्त नागपूर दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्याचा गौरव करत, 'संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या,' असे विधान केले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. 'स्वातंत्र्यलढ्यात संघ कुठे होता? हा शोध मोदींनी कुठून लावला?' असा थेट सवाल करत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
राऊत म्हणाले, 'संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या, असे मोदी सांगतात. पण भारतीय स्वातंत्र्यलढ्यात संघ कुठेच नव्हता. त्या लढ्यात महात्मा गांधी, सरदार पटेल, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले. मग, संघाचे योगदान नेमके काय?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
'देशाचा खरा इतिहास जनतेपासून लपवला जात आहे. लोकांना चुकीची माहिती देऊन अंधभक्त बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे थांबले पाहिजे,' असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा: भाजपाचा नवा अध्यक्ष ठरणार; 'या' नेत्यांची नावे आहेत चर्चेत
मोदींनी काय म्हटले होते?
नागपूरमध्ये गुढीपाडवा निमित्त मोदी म्हणाले, 'गुलामीच्या अखेरच्या काळात डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींनी राष्ट्रीय चेतनेला नवीन ऊर्जा दिली. आज संघाचा वटवृक्ष मोठा झाला आहे. संघ भारताच्या संस्कृतीचा आधुनिक अक्षयवट आहे,' असे गौरवोद्गार त्यांनी काढले. राऊत पुढे म्हणाले, 'स्वातंत्र्यलढ्यात संघ नव्हता, हा सत्य इतिहास आहे. पण तो दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा भ्रामक गोष्टी सांगून लोकांची दिशाभूल केली जात आहे. या देशाची प्रतिमा खोटारडेपणामुळे मलीन होऊ शकते,' असा गंभीर इशारा त्यांनी दिला.