बीड : रणजीत कासले याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कासलेने केलेल्या आरोपामुळे खळबळ माजली असतानाच त्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. कासलेच्या वक्तव्यांची चौकशी आता कशी होणार आणि त्याच्या दाव्यात जर तथ्य आढळले तर पुढची कारवाई कुणावर? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
एकापोठापाठ एक व्हिडीओ पोस्ट करत वादग्रस्त वक्तव्य केलेला रणजीत कासले 17 एप्रिल रोजी पुण्याच्या विमानतळावर उतरला तेव्हाच त्याच्या अटकेची शक्यता बळावली होती. पोलीस सेवा नियमावलीचा कासलेकडून भंग तर झालाच शिवाय त्याने केलेल्या आरोपामुळे कासलेविरोधात एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आहे. कासले याला त्याच प्रकारणात ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा : अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार होणार; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
कासलेची धक्कादायक दाव्यांची मालिका गेल्या महिनाभरापासून सुरु आहे. अटकेच्या आधी सुद्धा तो गप्प बसला नाही. कासलेच्या वक्तव्याची पोलीस दलात गंभीर दाखल घेण्यात आली. पोलीस सेवा नियमावलीचा कासलेकडून भंग होण्याबरोबरच अटकेत 24 तासापेक्षा जास्त काळ राहणार असल्याने आधीच निलंबित असलेल्या कासलेला बडतर्फ करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी म्हटले आहे की, पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी त्यांच्या पदास न शोभणारे वर्तन केले असून त्यांनी केलेल्या चुकीच्या, बेताल आणि बेजबाबदार वक्तव्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेन्द्र मिश्र यांनी बुधवारी आदेश काढून सेवेतून बडतर्फ केले आहे. यामुळे निवृत्त अधिकारी प्रश्न उपस्थित करत आहेत की, कासलेच्या आरोपांची चौकशी होणार की नाही?
'कासलेच्या आरोपांची चौकशी होणार की नाही?'
रणजीत कासलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने महिनाभरात अनेक आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी होणार की नाही असा प्रश्न निवृत्त अधिकारी उपस्थित करत आहेत. दरम्यान, रणजीत कासले हा विश्वासार्ह नसल्याचं दस्तुरखुद्द सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणत आहेत. दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडविरोधात आघाडी उघडलेली असताना कासलेबाबत मात्र त्यांची वेगळी भूमिका दिसत आहे.