जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी अचानक दोन वेळा मोठा आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. काहींना हा आवाज भूकंपासारखा वाटला, तर काहींनी मोठ्या स्फोटाशी तो संबंधित असावा, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केलं की, भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
घटनास्थळी प्रशासनाने पाहणी केली आणि नाशिक येथील मेरी संस्थेकडून याबाबत अधिकृत माहिती घेतली. संस्थेच्या अहवालानुसार, भूकंपाची कोणतीही नोंद नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आवाज आणि जाणवलेलं कंपन हे भूकंपाशी संबंधित नसल्याचं निष्पन्न झालं. प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता शांत राहण्याचं आवाहन केलं असून, या गूढ आवाजामागचं खरं कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
👉👉 हे देखील वाचा : Holi 2025: ठाणे महापालिकेची सिंगल-यूज प्लास्टिकवर कारवाई, 2139 किलो प्लास्टिक जप्त
स्थानिक नागरिकांमध्ये अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे. काहींनी हा आवाज मोठ्या स्फोटासारखा वाटल्याचं सांगितलं, तर काहींना आकाशात कोणतीही विशेष हालचाल झाल्यासारखी जाणवली. "आम्ही घराबाहेर पडलो, पण अजूनही समजत नाही की नक्की काय घडलं," असं एका रहिवाशाने सांगितलं. या घटनेचं गूढ अधिक उलगडण्यासाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.