मुंबई: मुंबईकरांचं वेळ वाचण्याचं कारण म्हणजे अटल सेतू. मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचे 12 ते 15 मिनिटांत पार करता यावे यासाठी अटल सेतू बांधण्यात आला.मात्र टोलमुळे प्रवाशांनी याकडे पाठ फिरवल्याचं दिसून येतंय. जास्तीच्या टोलमुळे प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद अटल सेतूला मिळू शकलेला नाही. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून वाहनांची संख्या रोडावल्याचे सांगितले जात आहे. याचपार्शवभूमीवर राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय आहे निर्णय?
मंत्रीमंडळाची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यात अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास मान्यता देण्यात आली.
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता यापुर्वी 4 जानेवारी 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या दराच्या 50 टक्के सवलतीच्या दराने पथकर आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता.
या दराचा एक वर्षानंतर आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक वर्षभर म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत सध्या सुरु असलेल्या सवलतीच्या दरानेच पथकर आकारणीस मान्यता देण्यात आली.