Saturday, May 31, 2025 01:32:59 AM

'आर्टिकल 370 हटवलं, निवडणुका झाल्या; आता पाकव्याप्त काश्मीर परत मिळायचाय..,' लंडनमध्ये जयशंकर यांचं मोठं विधान, जगाच्या भुवया उंचावल्या

S Jaishankar on Kashmir : एस. जयशंकर यांनी लंडन येथे एका मुलाखतीवेळी काश्मीर प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी दिलेल्या उत्तराने भुवया उंचावल्या असून सध्या सर्वत्र याच विधानाची चर्चा रंगली आहे.

आर्टिकल 370 हटवलं निवडणुका झाल्या आता पाकव्याप्त काश्मीर परत मिळायचाय लंडनमध्ये जयशंकर यांचं मोठं विधान जगाच्या भुवया उंचावल्या

S Jaishankar on Kashmir Issue, Article 360 & POK : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लंडन येथे एका मुलाखतीवेळी काश्मीर प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, 'पाकिस्ताने बळकावलेला भारताचा भाग (पाकव्याप्त काश्मीर) परत भारताला मिळण्याची आम्ही वाट पाहतोय. तो हिस्सा भारताकडे परत आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण होईल.' जयशंकर यांना काश्मीर खोऱ्यात शांतता निर्माण करण्याचा भारताचा फॉर्म्युला विचारला असता ते म्हणाले, 'जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी तीन टप्प्यांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. आम्ही त्यावर काम करत असून अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झालं आहे.' लंडनमधील थिंक टँक चॅथम हाउसमध्ये ‘भारताचा उदय व वैश्विक भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे ब्रिटन आणि आयर्लंडच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांना लंडनमधील चॅथम हाऊसमध्ये काश्मीर प्रश्नावर प्रश्न विचारण्यात आला. यावर जयशंकर यांनी काश्मीर मुद्द्यावर दिलेल्या उत्तराने सर्वांच्या भुवया उंचावल्या. शिवाय, ही योजना ऐकून पाकिस्तानचा जळफळाट तर नक्कीच होणार. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत घेतल्याने काश्मीर प्रश्न पूर्णपणे सोडवला जाईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा - Trump Addresses State Of Union : ट्रम्प यांच्या भाषणातील ठळक मुद्दे; भारत, चीन-ब्राझीलविरोधात आगपाखड, तर पाकिस्तानचे आभार

जयशंकर यांनी मांडली काश्मीरबाबतची भारताची भूमिका
लंडनमधील चर्चेवेळी एस. जयशंकर यांना एका पत्रकाराने काश्मीर प्रश्न भारत कसा सोडवणार आहे? तिथे शांतता कशी प्रस्थापित करणार? असा प्रश्न विचारला. यावर जयशंकर म्हणाले, 'काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्याची प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात आम्हाला कलम 370 हटवावं लागणार होतं. आम्ही पहिला टप्पा पूर्ण केला आहे. काश्मीरमध्ये शंतता निर्माण करण्यासाठीच आम्ही ते केलं. दुसऱ्या टप्प्यात काश्मीरमध्ये विकास व आर्थिक उलाढाल वाढवण्यासह सामाजिक न्याय बहाल करण्याची प्रक्रिया चालू आहे. तिसऱ्या टप्प्यात काश्मीरमध्ये मतदानाचं प्रमाण वाढवून लोकशाही अधिक बळकट करण्याचं काम केलं जात आहे. आम्ही नुकतीच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेतली. सरकारच्या या प्लानमुळे काश्मीरमध्ये बरेच बदल पहायला मिळाले आहेत. आर्टिकल 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये खूप जास्त मतदान झाले, असे त्यांनी नमूद केलं.'

अमेरिकेच्या धोरणांचा भारताला फायदा होईल : जयशंकर
दरम्यान, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांबाबत प्रश्न विचारल्यावर एस. जयशंकर म्हणाले, 'ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन सरकार बहुध्रुवीयतेच्या दिशेने चाललं आहे. अमेरिकेचं हे धोरण भारताच्या हिताचचं आहे. दोन्ही देश द्विपक्षीय व्यापारी कराराच्या आवश्यकतेवर सहमत आहेत.'

ब्रिटनच्या पंतप्रधानांची घेतली भेट
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी संध्याकाळी लंडनमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची भेट घेतली. दोघांमध्ये द्विपक्षीय सहकार्य आणि रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा झाली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या X हँडलवर या बैठकीची छायाचित्रे शेअर केली आहेत. दोघांमध्ये द्विपक्षीय सहकार्य आणि रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा झाली.

हेही वाचा - 'अमेरिकेने सोडली साथ, ब्रिटनने पुढे केला हात,' युक्रेन-रशिया युद्ध संपुष्टात येण्याची आशा धूसर?


सम्बन्धित सामग्री