श्रीनगर: मंगळवारी, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. सरकारने मृत पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना राज्यात परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या संदर्भात बारकाईने आढावा घेत आहेत आणि मार्गदर्शन करत आहेत.
हेही वाचा: पहलगाम येथे पोहोचताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी साधला पीडितांशी संवाद
पीडितांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदेंचे स्वीय सहाय्यक दाखल
मंगळवारी रात्री खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि त्यांची टीम श्रीनगरमध्ये दाखल झाली असून मृत पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना विमानात बसवून देण्यासाठी पोहोचली आहे. तर समन्वयासाठी मुंबईमध्ये पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित राहतील. त्यासोबतच, श्रीनगर येथे अडकलेल्या इतर पर्यटकांना राज्यात सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र राज्यातील अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेचं एक पथक अजूनही श्रीनगरमध्ये तळ ठोकून आहे. या घटनेतील मृत संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव एअर इंडियाच्या विमानाने श्रीनगर ते मुंबईत आणले आहेत. हे विमान बुधवारी दुपारी 12:05 वाजता मुंबईला निघाले. तर पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव संध्याकाळी 6 वाजता विमानाने पुण्यात दाखल झाले. त्यासोबतच, डोंबिवलीचे रहिवासी असलेल्या हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव दुपारी 1:15 वाजता विमानाने मुंबईत पोहोचले.