Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर भारतात वर्षांनुवर्षे राहिलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर मोठं संकट कोसळलं. हे लोक पाकिस्तानातून भारतात आल्यानंतर इथेच राहिले. त्यांचं घरही इथेच आहे. इतकेच काय, पण अशा एका पाकिस्तानी नागरिकाची कहाणी समोर आली आहे, ज्याने जम्मू-काश्मीरच्या पोलीस दलात तब्बल 27 वर्षे सेवा बजावली आहे. अशा व्यक्तीलाही देश सोडण्यास सांगण्यात आलं. इफ्तखार अली असं या व्यक्तीचं नाव असून त्यांचं वय 45 वर्षे आहे. पाकिस्तानात जाण्यापेक्षा आम्ही मरण पत्करु अशी भूमिका अनेकांनी घेतली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इफ्तखार आणि त्यांच्या आठ भावंडांना भारत सोडण्याची नोटीस आल्यानंतर त्यांनी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेनुसार जम्मू काश्मीर उच्च न्यायालायने त्यांना भारतात राहण्याची परवानगी दिली आहे.
हेही वाचा - '...मी सुइसाईड बॉम्बर म्हणून पाकिस्तानात जाईन,' कर्नाटकातील मंत्री जमीर खान यांचं वक्तव्य चर्चेत
पाकिस्तानचे नागरिक.. मग भारतातल्या पोलीस दलात कसे काय?
इफ्तखार अली यांनी जम्मू काश्मीरच्या पोलीस दलात जवळपास 27 वर्षे सेवा बजावली आहे. 26 एप्रिल रोजी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इफ्तखार अली यांना फोन करून सांगितले की, त्यांना आणि त्यांच्या आठ भावंडांना पाकिस्तान सोडावं लागणार आहे. हे ऐकताच अली यांना मोठा धक्का बसला. त्यांची पत्नी, मुले, नातेवाईक, मित्र, सहकारी हे सर्व भारतीय आहेत. आपल्याकडे जे काही आहे, ते भारतात आहे आणि पाकिस्तानात आपलं काहीही नाही, असं त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. इफ्तखार जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सलवाह गावात राहतात. दरम्यान, इफ्तखार यांनी त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकावर त्यांच्याविरोधात कारस्थान केल्याचा आरोप केला आहे.
काय आहे इफ्तखार यांचा आरोप?
इफ्तखार यांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या एका नातेवाईकाला त्यांची वडिलोपार्जित जमीन हडप करायची होती. जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात ही जमीन 17 एकरांवर पसरलेली आहे. इफ्तिखार अली म्हणाले, 'मला वाटतं एका महसूल अधिकाऱ्याने, जो आमचा दूरचा नातेवाईक आहे, त्याने अधिकाऱ्यांना माझ्याविरोधात भडकवले. त्यांनी आम्हाला काही न विचारता नोटिसा पाठवल्या. त्याला माझी जमीन बळकावायची होती. याची चौकशी झाली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, जमिनीच्या लोभापोटी रचलेले षड्यंत्र माझ्यापासून माझी मुले, माझा देश हिरावून घेऊन आपल्याला इतके दुःख कसे देऊ शकते?
उच्च न्यायालयाचा निर्णय काय?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इफ्तखार आणि त्यांच्या आठ भावंडांना भारत सोडण्याची नोटीस आल्यानंतर त्यांनी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेनुसार जम्मू काश्मीर उच्च न्यायालायने त्यांना भारतात राहण्याची परवानगी दिली आहे. तसंच, केंद्र सरकार आणि जम्मू आणि काश्मीर प्रशासनाला त्यांना भारत सोडण्यास भाग पाडू नये असे आदेश दिले. त्यामुळे, अली आणि त्याचे आठ भावंडे – मोठे भाऊ झुल्फकार अली (49), मोहम्मद शफीक (60), आणि मोहम्मद शकूर (52); आणि त्यांच्या बहिणी शाझिया तबसम (42), कौसर परवीन (47), नसीम अख्तर (50), अक्सीर अख्तर (54) आणि नशरून अख्तर (56) पुन्हा गावात परतले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही नोटीस फक्त इफ्तखार अली आणि त्यांच्या भावंडांना मिळाली होती. त्यांच्या पत्नी आणि मुलांना मिळाली नव्हती. कारण ते सर्वजण भारतात जन्मलेले आहेत.
इफ्तखार यांनी याचिकेत काय म्हटलं होतं?
इफ्तखार यांचे वडील फकरुद्दीन आणि आई फातिमा बी हे इफ्तखार दोन वर्षांचे असताना जम्मू काश्मीरच्या पूर्वीच्या राज्यात आले होते. याचिकेत इफ्तखार आणि त्यांच्या भावंडांनी म्हटले आहे की, त्यांचे वडील फकरुद्दीन हे 1955 च्या नागरिकत्व कायद्यानुसार ‘वंशपरंपरागत राज्याचे प्रजा’ आणि भारतीय नागरिक होते. त्यांनी असेही म्हटले आहे की, त्यांच्याकडे सलवाह गावात सुमारे 17 एकर जमीन आणि एक घर होते. त्यांच्या वडिलांना 1957 मध्ये जम्मू-काश्मीर संविधान लागू झाले, तेव्हाही जम्मू-काश्मीरचे कायमचे रहिवासी मानले जात होते. जम्मू आणि काश्मीर राज्यातील कायमस्वरूपी निवास सिद्ध करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर स्थायी रहिवासी प्रमाणपत्र (प्रक्रिया) कायदा, 1963 अंतर्गत जारी केलेले एक दस्तऐवज होते.
इफ्तखार यांचं कुटुंब भारतात कसं आलं?
1965 च्या युद्धादरम्यान पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील काही भाग ताब्यात घेतला. त्यावेळी या कुटुंबाचं वास्तव्य असलेल्या गावाचाही समावेश होता. परिणामी या कुटुंबाने त्या छावणीत अनेक वर्षे घालवले. त्यानंतर 1983 मध्ये हे कुटुंब सलवाहला परतले. तर, 1990 च्या उत्तारार्धात इफ्तखार राज्य पोलीस दलात सामील झाले. त्यावेळी दहशतवाद शिगेला पोहोचला होता. त्यांची पहिली पोस्टिंग 1998 मध्ये रियासी जिल्ह्यातील गुलाबगड भागातील देवल पोलीस चौकीत झाली, असंही याचिकेत नमूद आहे.
हेही वाचा - VIDEO: निषेधासाठी रस्त्यावर लावलेला पाकिस्तानी झेंडा काढण्याचा मुस्लीम विद्यार्थिनीचा प्रयत्न; शाळेतून हकालपट्टी
“जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या दहशतवादात, यांच्या कुटुंबापैकी कोणालाही संशयावरूनही पोलिसांनी किंवा लष्कराने चौकशीसाठी बोलावलेले नाही, कोणत्याही विघातक कृत्यात त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही सहभाग नव्हता,” असा दावाही याचिकेत करण्यात आला.
मंगळवारी दिलेल्या आदेशात, न्यायमूर्ती राहुल भारती म्हणाले की, फकरुद्दीन आणि त्यांचे कुटुंब चोरून भारतात आले नाहीत. अखेर इफ्तखार यांना त्यांच्या भावांना पाकिस्तानात जावे लागणार नाही, असा निर्वाळा न्यायाधीशांनी दिला आणि या सर्वांना दिलासा मिळाला. या कठीण काळात जम्मू-काश्मीर पोलीस दलाकडून मिळालेल्या समर्थनाबाबत इफ्तखार यांनी आभार मानले.