Panipuri प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
नांदेड: नांदेड शहरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिथे अन्नातून विषबाधा झाल्यामुळे 31 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाच पाणीपुरीच्या स्टॉलवरील नाश्ता खाल्ल्यानंतर हे सर्व विद्यार्थी आजारी पडले. ही घटना गुरुवारी पहाटे घडली आणि सर्व पीडितांना उपचारासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणण्यात आले.
आजारी पडलेले विद्यार्थी नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, SGGS कॉलेज, एक नर्सिंग कॉलेज या तीन प्रमुख शैक्षणिक संस्थांशी संबंधित आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या एकाचं पाणीपुरी विक्रेत्याकडून पाणीपुरी खाल्ल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी उलट्या, मळमळ आणि अस्वस्थतेची तक्रार केली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हेही वाचा - चुकूनही मुळ्यासोबत खाऊ नका हे 5 पदार्थ; अन्यथा होईल ''फूड पॉइझनिंग'', पचनसंस्था पूर्ण बिघडून जाईल
विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू -
दरम्यान, रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, पहाटे 4 वाजल्यापासून विद्यार्थी उलट्या, मळमळ आणि अस्वस्थतेची तक्रार देऊन रुग्णालयात येत होते. त्यांना तपासणीनंतर वेगवेगळ्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात असले तरी, या घटनेमुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
हेही वाचा - वर्ध्यातील 57 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा
पाणीपुरी किंवा गोलगप्पा हे देशभरात खूप लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, परंतु स्वच्छतेच्या अभावामुळे त्यामुळे अनेकदा अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. उघड्या, घाणेरड्या पाण्यात ठेवलेली चटणी आणि अस्वच्छ हातांनी बनवलेल्या पाणीपुरीमुळे संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे उघड्यावर बाहेर पाणीपुरी खाताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.