अमरावती: उन्हाळ्याच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या असून, शहरातील तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती महापालिकेच्या वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजपासून (23 एप्रिल) दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत शहरातील सर्व प्रमुख ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहेत.
हा निर्णय विशेषतः दुचाकीस्वार नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. दुपारच्या कडक उन्हात सिग्नलला थांबावे लागत असल्यामुळे दुचाकीस्वारांना रखरखत्या उन्हात उभं राहावं लागतं. त्यामुळे उन्हात चक्कर येणे, डोके दुखणे, घामाच्या प्रवाहामुळे अशक्तपणा जाणवणे अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.
शहरातील जवळपास 9 ते 10 प्रमुख ठिकाणचे ट्रॅफिक सिग्नल विशेषतः ज्या ठिकाणी वाहतूक प्रचंड प्रमाणात असते ते आता दुपारच्या वेळेस बंद ठेवले जातील. यात राजकमल चौक, गांधी चौक, नवीन बस स्टँड, बडनेरा रोड, इरविन चौक, कॅम्प क्षेत्र आदी महत्त्वाच्या सिग्नलचा समावेश आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली आहे.
हेही वाचा :वरूथिनी एकादशी 2025: एकादशी कधी आहे? जाणून घ्या व्रताची वेळ, तिथी, पूजा विधी आणि महत्त्व
वाहतूक विभागाचे पोलीसनिरीक्षकांनी सांगितले की, शहरातील नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. सध्या अमरावतीमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना थोडा दिलासा मिळावा यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. या काळात वाहतुकीसाठी हात संज्ञांचा वापर करण्यात येईल आणि वाहतूक पोलीस रस्त्यावर तैनात राहतील.
या निर्णयाचे शहरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत ही अभिनव कल्पना असल्याचे सांगितले आहे. एका दुचाकीस्वाराने सांगितले, दुपारी उन्हात सिग्नलला थांबणं म्हणजे छातीवर लोहाच्या तुकड्यांसारखं जाणवतं. आता तरी काहीसा दिलासा मिळणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही तात्पुरती युक्ती असली तरी भविष्यात शहरांमध्ये उष्णतेशी लढण्यासाठी अधिक व्यापक उपाययोजना करणे गरजेचे आहे. झाडे लावणे, सावली देणारे रस्ते विकसित करणे, नागरिकांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे उपाय असू शकतात.
या निर्णयामुळे वाहतूक व्यवस्था थोडी विस्कळीत होण्याची शक्यता असली, तरीही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तो उपयुक्त ठरणार आहे. उन्हाच्या तडाख्यातून थोडा का होईना, पण दिलासा मिळाल्याने अमरावतीकर सध्या या निर्णयाने खूश आहेत.