मुंबई : यंदाचा मॉन्सून वेळेआधीच देशात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळमध्ये 27 मे पर्यंत मॉन्सून दाखल होणार असून, त्यानंतर 6 जून रोजी तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल होणार आहे. यामुळे यंदा मॉन्सून नेहमीच्या तारखेच्या तुलनेत जवळपास 5 दिवस आधी केरळात पोहोचेल. मागील वर्षी 1 जून रोजी केरळात पावसाचा पहिला शिडकावा झाला होता. मात्र यंदा हवामानाच्या अनुकूल परिस्थितींमुळे मॉन्सून लवकर दाखल होईल, असे खात्रीने सांगितले जात आहे.
हेही वाचा: मातृदिन विशेष: आईसाठी कोट्स, शुभेच्छा आणि गोड शायरी
या आधीच्या अंदाजानुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात कोकण, गोवा, तसेच महाराष्ट्रातील अन्य भागांत पावसाची हजेरी लागते. मात्र यंदा तळ कोकण, म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात 6 जूनच्या सुमारासच पावसाचा जोर जाणवू लागणार आहे. यामुळे शेतीसाठी आवश्यक नियोजन लवकर करता येणार आहे, हे शेतकऱ्यांसाठी सकारात्मक लक्षण मानले जात आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदाचा मॉन्सून 'सामान्य ते अधिक' प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी योग्य तयारी ठेवावी, असे आवाहन कृषी विभागाकडूनही करण्यात आले आहे. लवकर येणारा मॉन्सून शेतीसाठी वरदान ठरू शकतो, मात्र यासोबतच मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती उद्भवू नये, यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज राहण्याची आवश्यकता आहे.
सध्याचे हवामान
राज्यात सध्या अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात बदल झाले आहेत. पुढील तीन ते चार दिवस विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत तापमान सध्या 31 अंश सेल्सिअस आहे आणि वातावरण ढगाळ आहे. हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण अधिक असून, काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी आणि घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.