मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण पुन्हा तापू लागलं आहे. अशातच शरद पवार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रभावावर भाष्य करत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईत काय परिणाम होईल, असा प्रश्न शरद पवार यांना अनौपचारिक चर्चेत विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अनुभवातून आलेलं स्पष्ट मत मांडलं.
शरद पवार म्हणाले, 'राज ठाकरे यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, त्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होत नाही. मनसेला अपेक्षित मते मिळत नाहीत.'याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवत सांगितलं, 'उद्धव ठाकरे यांच्या सभांना देखील गर्दी होते, मात्र ती गर्दी मतांमध्ये परिवर्तित होते. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वात यश मिळतं, हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आलं आहे.'
हेही वाचा: भाजपाने महाराष्ट्र संपवण्याचं काम सुरू केलंय; संजय राऊतांचा भाजपा नेतृत्वावर हल्लाबोल
या विधानातून स्पष्ट होते की, फक्त सभा गाजवल्याने यश मिळत नाही, तर मतदारांशी असलेला संवाद, विश्वास आणि संघटनशक्ती देखील तितकीच महत्त्वाची आहे. राज ठाकरे यांची वक्तृत्वशैली आणि शैली लोकांना आकर्षित करते, पण प्रत्यक्ष मतदानात त्याचा परिणाम कमी प्रमाणात दिसतो. त्याउलट उद्धव ठाकरे यांचा संवाद आणि जनाधार अधिक ठाम आहे, असे संकेत पवार यांनी दिले आहेत.
पुढे बोलताना शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले, 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने (मविआ) एकत्र लढल्या पाहिजेत. कारण महायुतीमध्ये जागा वाटप व्यवस्थित होईल, असं वाटत नाही. त्यामुळे त्याचा फायदा मविआला होऊ शकतो.'
यातून शरद पवारांनी सूचित केलं आहे की, भाजप, शिंदे गट आणि मनसे यांच्या महायुतीमध्ये अंतर्गत वाद किंवा मतभेद संभवतात, जे जागावाटपात अडथळा ठरू शकतात. अशा वेळी मविआ एकत्र राहिल्यास त्यांना संधी अधिक मिळू शकते.
हेही वाचा: Anti Submarine Warfare ARNALA: INS अर्नाळा’ची नौदलात दमदार एंट्री; देशातील पहिले अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट होणार कमिशन
राज आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकत्र आले, तर त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होईल यात शंका नाही. मात्र, शरद पवारांनी 'गर्दी' आणि 'मतं' यामधील फरक अधोरेखित केला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतही केवळ सभा नव्हे, तर मतदारांचा प्रत्यक्ष पाठिंबा कुणाला मिळतो, यावरच यश अवलंबून राहणार आहे.