शिरूर: भारतासारख्या बहुधर्मीय आणि लोकशाही देशात प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्य आहे. मात्र फसवणूक, दबाव, भीती दाखवून किंवा आर्थिक मदतीच्या आमिषाने धर्मांतर घडवून आणले जाते. अशा घटनांमुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असते आणि सामाजिक सलोखा धोक्यात येतो. याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील एका हिंदू कुटुंबावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचा आणि आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राहुल गायकवाड आणि त्यांच्या पत्नीने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत गायकवाड दाम्पत्याने नमूद केलं आहे की, बायबल वाचा, ख्रिश्चन धर्म स्वीकारा, आम्ही आर्थिक मदत करू असे सांगून आरोपींनी त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धार्मिक श्रद्धेचा अपमान करण्यात आला आणि त्यांच्या घरातील हिंदू देव-देवतांविषयी अपशब्द वापरण्यात आले. त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.
हेही वाचा: अतुलशास्त्री भगरे यांची धक्कादायक भविष्यवाणी; येत्या 36 तासांत भारत-पाकिस्तान युद्ध?
या प्रकारामागे फक्त धर्मांतराचा नव्हे, तर हिंदू आणि ख्रिश्चन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हेतू असल्याचा आरोपही गायकवाड यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे समाजात धार्मिक विघटन घडवून आणण्याचा प्रयत्न झाला असून, हा सामाजिक सलोख्यावर आघात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
शिरूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित सात जणांविरुद्ध भारतीय दंड विधानातील धार्मिक भावना दुखावणे, फसवणूक, धमकी, आणि सामाजिक तेढ निर्माण करण्यासंदर्भातील कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक पातळीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. नागरिकांनी पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.धार्मिक जबरदस्ती करणे ,भावना दुखावणे किंवा फसवणुकीच्या माध्यमातून धर्मांतर घडवून आणणे हे अत्यंत चुकीचे आहे. याबद्दल कठोर कारवाई करणे काळाची गरज आहे .
धर्मांतरासारखा संवेदनशील विषय हाताळताना सजगतेने आणि कायद्याच्या चौकटीत राहून वागणं आवश्यक आहे.