विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा येथील वर्षानुवर्षाचा मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित पडलेला होता. यावर्षी सरपंच उषा दिनकर मापारी यांनी पुढाकार घेऊन गावातील मातंग, बौध्द समाजांच्या स्मशानभूमीचा प्रश्न अखेर कायम स्वरूपीसाठी मार्गी लावला. पैठण तालुक्यातील मुरमा हे दोन हजारांहून अधिक लोकसंख्येचे गाव आहे. या गावात सर्वधर्मीय नागरिक राहतात, परंतु गावात अनेक वर्षांपासून मातंग ,बौध्द समाजांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या मृतांवर अंत्यसंस्कार करताना जागेअभावी विटंबना होत असायची. यामुळे सरपंच उषा मापारी यांनी या बाबतीत खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांना पत्रव्यवहार करून गावात मातंग, बौध्द समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची गरजेचे असल्याचे सांगितले, यानंतर सरपंच उषा मापारी यांनी दोन्ही समाजाच्या स्मशानभूमीचा प्रस्ताव दाखल केला. तब्बल दोन वर्ष पाठपुरावा केल्यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत शासनाकडून बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीच्या कामाला मंजुरी मिळाली.
तर मातंग समाजासाठी सामाजिक स्मशानभूमी मातंग समाज या योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली. यानंतर दोन्ही स्मशानभूमीचे काम तातडीने करण्यात आले. आज मातंग समाज व बौद्ध समाज यांना गेल्या 50 ते 60 वर्षांनंतर हक्काची स्मशानभूमी मिळाली आहे. मुरम्यात मातंग, बौध्द, हिंदू या तिन्ही समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीचे काम करण्यात आले आहे. यानंतर मृत्यू झाल्यास त्या मृतांवर अंत्यसंस्कार करताना त्यांची विटंबना होणार नसल्याचे गावकरी सांगत आहेत.
Today's Horoscope: आज करिअरसाठी महत्त्वाचा दिवस असणार, जाणून घ्या...
गावाचा विकास हाच आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. गावातील मातंग अथवा बौद्ध समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधी करण्यासाठी त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ही खूप मोठी समस्या होती. गावात सर्व धर्मियांना स्वतंत्र स्मशानभूमी असावी यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला. यामध्ये बौद्ध आणि मातंग समाजाच्याही स्मशानभूमीसाठी प्रस्ताव करण्यात आला. प्रस्ताव मंजूर झाला असून दोन्हीही समाजाच्या स्मशानभूमीची कामं पूर्ण झाली आहेत. गावातील विकासकामासाठी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांचेही मोठे सहकार्य झाले, तसेच दोन्ही स्मशानभूमीमध्ये सुशोभीकरण करून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येतील असे मुरम्याच्या सरपंच उषा दिनकर मापारी यांनी म्हटले आहे.
यापूर्वी आमच्यातील कोणाचेही निधन झाले तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र समशानभूमी नसल्याने आम्हाला अनेक अडचणी असायच्या, बौद्ध समाजासाठी एक स्वतंत्र स्मशानभूमी बांधण्यात यावी, यासाठी आम्ही ग्रामपंचायतकडे मागणी केली असता त्यांनी स्मशानभूमीचा प्रस्ताव तयार करून स्मशानभूमी बांधकाम करून दिले आहे. यामुळे आमच्या बौद्ध आणि मातंग समाजातील पिढ्यानपिढ्या प्रलंबित राहिलेला स्मशानभूमीचा प्रश्न सरपंच उषा दिनकर मापारी यांनी मार्गी लावला असल्याचे रामेश्वर मोठे, उध्दव मगरे,गोपिचंद आहेर, मुरलीधर निर्मळ यांनी म्हटले आहे.