KKR Vs RCB : आरसीबीने गतविजेत्या केकेआरचा उडवला धुव्वा, विराटची नाबाद अर्धशतकी खेळी
कोलकाता : IPL २०२५ च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा ७ गडी राखून पराभव केला. केकेआर संघाने दिलेले १७४ धावांचे आव्हान आरसीबीने अवघ्या ३ गड्याच्या मोबदल्यात १६.२ षटकात पूर्ण केले. सलामीवीर फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी व्यक्तिगत अर्धशतक ठोकत संघाला 'विराट' विजय मिळवून दिला.
केकेआरने विजयासाठी दिलेल्या १७५धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात जोरदार झाली. विराट कोहली आणि फिल सॉल्ट या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. सॉल्टने केकेआरची गोलंदाजी अक्षरक्ष: फोडून काढली. त्याने २५ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. यात ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. वरुण चक्रवर्तीने त्याला बाद करत केकेआरला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या देवदत्त पडिक्कलला (१०) सुनील नरेनने बाद केले.
दुसरी बाजू लावून धरत विराटने फटकेबाजी केली. त्याने कोहलीने ३० चेंडूंमध्ये नाबाद ५९ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. विराटचे हे ५६ वे आयपीएल अर्धशतक ठरले. विराटला कर्णधार रजत पाटीदारने चांगली साथ दिली. पाटीदारने १६ चेंडूंमध्ये ३४ धावांची आक्रमक खेळी केली. विराट आणि पाटीदार जोडीने केकेआरच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्यांच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने सामना अवघ्या १६.२ षटकात जिंकला.
हेही वाचा - Yuzvendra Chahal Viral T-Shirt: युझवेंद्रने दिला टी-शर्टद्वारे अनोखा टोमणा
तत्पूर्वी, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरची सुरुवात खराब झाली. अवघ्या चार धावांवर क्विंटन डिकॉकला जोश हेजलवुडने माघारी पाठवले. त्यानंतर मात्र सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी करत आक्रमक फलंदाजी केली.
हेही वाचा - IPL 2025: आयपीएल मधून उद्योगपती मुकेश अंबानी किती कमवणार?
रहाणेने ३१ चेंडूंमध्ये ५६ धावांची शानदार खेळी केली. ज्यात ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तर नरेनने २६ चेंडूंमध्ये ४४ धावा करत आपलं योगदान दिले. मात्र रहाणेच्या विकेटनंतर केकेआरची गाडी घसरली. अंगकृष रघुवंशी (३०), व्यंकटेश अय्यर (६), रिंकू सिंग (१२), आंद्रे रसेल (४), हर्षित राणा (५), यांना मोठी खेळी करता आली नाही. शेवटी केकेआरने २० षटकांत ८ बाद १७४ धावा केल्या. आरसीबीच्या गोलंदाजांमध्ये क्रुणाल पांड्या सर्वात प्रभावी ठरला. त्याने ४ षटकांत २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तर जोश हेजलवुडने २, तर यश दयाल, रसिख सलाम आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.