मुंबई: महाराष्ट्र राज्यात सायबर सुरक्षा धोरण तयार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज 2025 च्या सायबर सुरक्षा धोरण कार्यदलाची स्थापना केल्याचे जाहीर केले. या कार्यदलाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आयटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि संरक्षण करण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
महाराष्ट्र सरकारमार्फत तब्बल 800 शासकीय सेवा नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून दिल्या जातात. तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत असून तो आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व पैलूंना प्रभावित करत आहे. सायबर गुन्हेगारी आणि बेकायदेशीर सायबर/डिजिटल गुन्ह्यांचा वाढता धोका ओळखता महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण 2025 हे राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण 2013 आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण 2020 या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित असणार आहे असे देखील राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केले.
नागरिक, शैक्षणिक संस्था, उद्योग, स्टार्टअप्स आणि सरकारी क्षेत्रासाठी एक मजबूत सायबर सुरक्षा प्रणाली निर्माण करणे, सरकारी आणि निमसरकारी आयटी पायाभूत सुविधांची सुरक्षा करणे हा या धोरणाचा मुख्य हेतू आहे. तसेच महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार नागरिकांना सुरक्षित डिजिटल सेवा सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.